प्राचीन भारतातील समाज, धर्म हे सुसंस्कृत व सभ्य मानले जात होते, परंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडून १९व्या शतकापर्यंत त्यात विघातक बदल घडून आले. परिणामी पारतंत्र्य आलेच, परंतु स्त्री व शूद्रांचे साधारण मानवी अधिकारही तत्कालीन धार्मिक व्यवस्थेने नाकारल्याने समाजाची सर्वांगीण प्रगती खुंटली. अशा परिस्थितीत व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक व धार्मिक बंधनांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धिप्रामाण्यवाद या पाश्चात्त्य विचारांची इंग्रजी शिक्षणाद्वारे ओळख झाल्याने भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी जवळजवळ शतकभर यासाठी कार्य केले व त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकांत प्रामुख्याने वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्चितच मदत होईल.